Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Thursday, May 29, 2014

0 वळून पाहताना भाग ४


१९६५च्या युद्धाचा विचार करताना पाकिस्तानने किवा त्यांच्या राज्यकर्त्यांनी हाच काल का निश्चित केला हे ध्यानात घेतले पाहिजे. सन १९६४ला पंडित नेहरुचे मेमध्ये निधन झालेले होते व देशाचे शासन नव्या पंतप्रधानाकडे होते. काश्मीर मधील स्थिती गंभीर होती, तेथे संविधानाचे कलम ३५६ व ३५७ लागू करण्यात आले होते व शेख अब्दुल्ला यांनी ते काश्मीरच्या अधिकारावर अतिक्रमण असल्याचे जाहीर केले होते. ह्या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणजे पाकिस्तानचा गैरविश्वास/गैरसमज झाला कि पाकिस्तानच्या सैन्याला ह्या फुटीरतावादी गटांकडून सहकार्य/फायदा होईल. पाकिस्तानी थिंक-टेकने असाही विचार केला होता कि १९६२च्या भारत-चीन युद्धातील पराभूत भारतीय सैन्याचे मानसिक खच्चीकरण झाले असल्यामुळे ते पाकिस्तानी सैन्याचा सामना करू शकणार नाहीत. पंजाबी मुसलमानांचे वर्चस्व असलेल्या पाकिस्थानी सैन्यात एक असाही गैरसमज रुजवला गेला आहे की ते एका लढवय्या जमातीचे सदस्य असून एक पाकिस्थानी सैनिक चार-चार भारतीय सैनिकांना भारी आहे.

       दिनांक ५ ऑगस्ट, १९६५ ला २२,००० ते ३३,००० पाकिस्तानी सैनिकानी काश्मिरी नागरिकांच्या वेषात काश्मीरच्या विविध भागात घुसखोरी केली. असे करताना पाकिस्तान विधिवत युद्धाची घोषणा करण्याचे सुद्धा विसरले. गम्मत अशी कि ह्या घुसखोरीची प्रथम सूचना आपल्या सैन्यांला काश्मिरी नागरिकांनीच दिली होती, ज्यांच्याकडून पाकीस्थान मदतीची अपेक्षा करीत होता. प्रथम युद्धाची व्याप्ती, आर्टिलरी आणि चिलखती गाड्याची गतीविधी काश्मीरच्या विविध भागापर्यत मर्यादित होती तर ६५च्या युद्धात भारतीय वायुसेनेचा सहभाग उल्लेखनीय होता. सप्टेबरच्या सुरवातीला पाकिस्तानी सैन्याने जेव्हा अखनूरवर हल्ला केला, तेव्हा भारतीय सेनेने प्रथमच आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन करून पाकिस्तानी ठिकाणांवर हल्ला केला ज्यायोगे पाकिस्तानी सैन्याचे लक्ष विचलित व्हावे. सियालकोट क्षेत्रात ह्या युद्धातील सर्वात मोठी लढाई झाली ज्यात ४००-६०० रणगाडे सामील झाले होते. सप्टेंबर २२ ला संयुक्त संघाच्या पुढाकाराने दोन्ही देशात युद्धबंदी झाली.

       ह्या युद्धाची परिणीती फक्त एकमेकांचे काही युद्धबंदी व काही वर्ग किलोमीटर क्षेत्र ताब्यात घेण्यात झाली मात्र दोहोंची फार मोठ्या प्रमाणावर मनुष्य व अन्य हानी झाली.

               सम्या, ह्या युद्धाची आंतरराष्ट्रीय परिणीती मात्र खूप अनपेक्षित अशी होती. ह्याच वेळी अमेरिका विएतनामच्या युद्धात गुंतलेली होती. एकीकडे अपेक्षेप्रमाणे अमेरिकेने पाकिस्तानच्या मदतीला न येता, तटस्थ असल्याचे पत्रक जारी केले. येव्हडेच नव्हे तर अमेरिकेने पाकीस्थानला देण्यात येणारी सैनिकी मदतही कमी केली. इराण, इंडोनेशिया व विशेषत्वाने चीनने पाकचे राजनयिक समर्थन (Political support) केले. आणखी एका अनपेक्षित घटनेत जो भारताच्या बाजूने सतत उभा रहात होता त्या रशियाने आपण तटस्थ असल्याचे जाहीर केले व नंतरच्या काळात जानेवारी, १९६६मध्ये ताश्कंदला दोन्ही देशात करार घडवून आणण्यात महत्वाची भूमिका वठवली. तुला आठवत असेल येथेच आपल्या पंतप्रधानाचा मृत्यू झाला. ताश्कंदला मोठी स्वप्ने घेऊन गेलेला हा वीर मात्र खऱ्या अर्थाने मायदेशी परत आलाच नाही. राजकारणात कोणी कुणाचे नेहमीचे दोस्त वा शत्रू नसतात हेच खरे!

                             दोस्त दुश्मन पे कुछ नही मौकुफ
                             एक जमाना है अपने मतलब का.

     ह्याच युद्धापासून पाकच्या परराष्ट्र धोरणात अमुलाग्र बदल झाला. पूर्वी ते एकाच देशावर – अमेरिकेवर – अवलंबून असत. आता त्यांनी रशिया व चीनशी दोस्ती करण्यासाठी प्रयत्न सुरु केले, ते भारताशी तुलनात्मक रीत्या स्पर्धेत राहावे म्हणून. बेटा समीर, पाकीस्थानवरचा चीनचा वाढता प्रभाव व नजीकच्या काळात त्यांनी पाकीस्थानला वेळोवेळी केलेल्या मदती मागचा अर्थबोध आता स्पष्ट होऊ लागला असेल.  पाकीस्थानी “Triangle Tightrope”  नीती म्हणजे एकीकडे जुन्या सहकाऱ्याशी – अमेरिकेशी - चांगले संबंध ठेवायचे तर दुसरीकडे चीन व रशियाशी संबंध विकसित करायचे. १९६६मध्ये लष्करी मदती पासून सुरु झालेले हे पाक-चीन संबंध आज इतके विस्तारले आहेत कि चीन हा पाकिस्तानला शस्त्रास्त्र पुरविणारा जगातला सर्वात मोठा देश तर पाकिस्तानशी व्यापार-उदीम करणाऱ्या देशांत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. हे सहकार्य पाणबुडी पासून ते अणु-उर्जेच्या नावाखाली आण्विक अस्त्र निर्मिती पर्यंत पोचले आहे. आपल्या सारख्या सामान्य माणसाला ‘आगे आगे देखिये होता है क्या’ शिवाय पर्याय नाही. 

 प्रकाश पटवर्धन



No comments: